28.5 C
Ratnagiri
Thursday, June 5, 2025

सागरी महामार्गावर दाभोळमध्ये पूल..

कोकणातील सागरी महामार्गावरील काळबादेवी आणि जयगड येथील...

चिपळूणमधील खाऊगल्ली अतिक्रमणमुक्त – पालिका प्रशासन

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या पालिकेने...

वाशिष्ठी किनारी संरक्षक भिंत नलावडे बंधारा सज्ज

दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी...
HomeRatnagiriपालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

अधिवेशन संपताच मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले.

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट) तसेच अन्य छोटे पक्ष यांच्या महायुतीला २८८ पैकी २३२ जागा मिळाल्या. काही अपक्षांच्या पाठींब्यासह ही संख्या २३७ पर्यंत पोहोचली आहे. इतके प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सरकारचा शपथविधी तात्काळ होऊ शकला नाही. ५ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारासाठी आणखी १० दिवस गेले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.

अधिवेशन संपले तरी – १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झाले. संपूर्ण अधिवेशन पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालेले नव्हते. खातेवाटप जाहीर होताच नाराजी उफाळेल आणि अधिवेशन काळात काही संकट ओढवेल या भीतीपोटी खातेवाटप लांबविण्यात आले. म्हणजेच प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीतील घटकपक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्टपणे दिसत आहे.

पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच – अधिवेशन संपताच मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. त्यावेळी २ दिवसांत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र आता आठवडा उलटून गेला तरीही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. ज्या जिल्हयात एकापेक्षा अधिक मंत्री आहेत त्या जिल्हयांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ठाणे उपमुख्यमंत्र्यांकडे? – ठाणे जिल्हयाचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल हे स्वाभाविक आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी याआधी आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सांभाळले होते. नक्षलग्रस्त अशा गडचिरोलीचे पालकमंत्रीपद पुन्हा मिळावे अशी शिंदेंची इच्छा असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचवेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सांभाळण्यास आपण असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना इच्छुक सांगितले आहे. मात्र याबाबतचा निर्णय आपण सहकाऱ्यांशी चर्चा करूनच घेवू असेदेखील फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे ठाणे जिल्हयाचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार अशी चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे जर गडचिरोलीचे पालकमंत्री झाले तर त्यांना ठाणे सोडावे लागेल. अशावेळी परिवहनमंत्री ना. प्रताप सरनाईक किंवा कामगारमंत्री आणि भाजपचे नेते ना. गणेश नाईक यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हेच ठाण्याचे पालकमंत्री होतील. असे झाल्यास प्रताप सरनाईक यांना पालघरचे पालकमंत्रीपद मिळू शकते.

मुंबईचे पालकमंत्री कोण? – मुंबई महानगर आणि मुंबई उपनगर अशी पालकमंत्र्यांची दोन पदे आहेत. मागील सरकारमध्ये मुंबई महानगराचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे तर उपनगराचे पालकमंत्रीपद भाजपकडे होते. शिवसेनेचे दीपक केसरकर तर भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्याकडे ही पदे होती. शिवसेनेकडून मुंबईच्या पालकमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईतून निवडून आलेला शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार मंत्रीमंडळात नाही. त्यामुळे मुंबईची जबाबदारी कोण सांभाळणार याविषयी चर्चा सुरू आहेत. भाजपच्यावतीने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ना. आशिष शेलार आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ना. गणेश नाईक या दोघांपैकी एकाच्या गळ्यात मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद पडू शकते.

रायगडमध्ये रस्सीखेच – सर्वाधिक रस्सीखेच रायगडमध्ये पाहायला मिळते आहे. शिवसेनेचे नेते आणि रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले आणि श्रीवर्धनच्या आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवानेत्या, महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे हे दोन मंत्री पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच मागील सरकारमध्येसुध्दा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या जिल्हयातून निवडून आलेल्या एकमेव आमदार मंत्री असूनही त्यांच्याऐवजी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हयातील आमदार उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडचाच आमदार पालकमंत्री असेल असे सांगितले जात आहे. ना. भरत गोगावले यांचे नाव चर्चेत आघाडीवर असले तरी ना. तटकरेदेखील तितक्याच आग्रही आहेत.

जिल्हयाच्या रत्नागिरी – पालकमंत्रीपदासाठी दापोली विधानभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा संघर्ष करून निवडून आलेले गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम हे देखील इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. मागील सरकारमध्ये पालकमंत्रीपद भूषविणारे रत्नागिरीचे आमदार आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचाही दावा स्वाभाविकपणे आहे. मात्र त्यांच्याकडे मुंबईचे पालकमंत्रीपद सोपविण्याचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येते. तसे झाल्यास रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची माळ गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या गळ्यात पडू शकते.

सिंधुदुर्गात नितेश राणेच – सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्रीपद मत्स्यव्यवसाय मंत्री आणि देवगड कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे ना. नितेश नारायण राणे यांना मिळेल असे वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात मंत्रीपद मि ळालेले ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळे या पदासाठी महायुतीत वाद नसावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

पुणे, जळगाव, सातारा, नागपूर – याचबरोबर पुणे, जळगाव, सातारा, नागपूर, नाशिक आदी अनेक जिल्हयांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच आहे. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यात चुरस आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देवू नये अशी मागणी अनेक आमदार करत आहेत. ना. पंकजा मुंडे यांदेखील बीडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. साताऱ्यामध्ये बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यात चुरस आहे. कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला. हवे असून त्यासाठी माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे नाव भाजपकडून पुढे आणले जात आहे. यासाठी जळगावचे पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजप तयार असल्याचे कळते. शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भूसे हेदेखील नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

२६ जानेवारी उजाडणार? – पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच पाहता २६ जानेवारीच्या झेंडावंदनापूर्वी ४ दिवस आधी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular