रत्नागिरी तालुक्यातील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या सांडव्याजवळ भुस्खलन झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी खचलेली जमीन आता अजून दहा गुंठे पुन्हा खचली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांमुळे तालुक्यामध्ये भुस्खलनाचे प्रकार घडून येत आहेत. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या सांडव्याजवळ भुस्खलन होत असून तेथील डोंगरचा काही भाग खचण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ४० गुंठे जमीन खचली असून आंबा, काजूची चाळीस झाडे उन्मळून पडली आहेत. आंबा, काजूच्या कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपले असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून, काही ठिकाणी पडझड झाल्याचे प्रकार सातत्याने सुरुच आहेत. शिळ धरणाच्या सांडव्यापासून दीडशे मीटर अंतरावरील बाजूचा भाग खचल्याने जी भीती जाणवत होती तीच घडत आहे, तेथील डोंगर हळू हळू खचत खाली येत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा भाग असाचा कोसळत राहीला तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी घटनास्थळाची पाहणी तहसिलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप नाचणकर यांच्यासह पोलिस पाटील सोनिया कदम आणि ग्रामस्थांनी केली. रत्नागिरीतील पाटबंधारे विभागाकडून शिळ धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा भागात संरक्षक भिंत उभारण्याचा ६ कोटी ९४ लाखाचा प्रस्ताव मुंबईतील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर दोन दिवसांपुर्वी खचलेल्या २०० मीटर भागात आणखी नवीन संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्तावही नव्याने पाठविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.