उत्तर प्रदेश लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रत्नागिरीमध्ये संपूर्ण बंदची हाक पुकारण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या च्या पदाधिकाऱ्यांनी काल रत्नागिरी व्यापारी महासंघाला बंद मध्ये सामील होण्याची विनंती केली होती. तेंव्हा कोणताही निर्णय झालेला नसून, केवळ या विनंतीनुसार आज रत्नागिरी शहरातील व्यापारी आपली दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवणार आहेत.
आज सकाळपासून बहुतांश व्यापाऱ्यानी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. काही तुरळक प्रमाणात सुरू असणारी दुकाने बंद करण्यासाठी आज सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वत्र फिरत होते. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १ नंतर मात्र संपूर्ण बाजारपेठ सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे.
आज लांजा शहरात देखील बहुतांश दुकाने बंद असल्याचे चित्र आहे. हा बंद व्यापाऱ्याना परवडणारा नसला तरी राजकिय पक्षांच्या विनंतीला मान देऊन व्यापारी बंद मध्ये सहभागी झालाय मात्र यापुढे राजकिय पक्षांनी असे बंद करू नयेत व व्यापाऱ्याना वेठीस धरू नये असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचार घटनेमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बंदची हाक पुकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा. या वेळेत सिंधुदुर्ग बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.