जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळतीची दाहकता ताजी असताना शहरातील साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स कंपनी परिसरामध्ये मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांत घबराट पसरली. दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात झालेल्या वायू गळतीने दोघे बाधित झाले. वायू गळतीच्या संशयाने अनेकांची भीतीने गाळण उडाली; परंतु चौकशी केली तेव्हा एमआयडीसीतील कंपनीच्या उत्पादनातून दुर्गंधी पसरल्याचे लक्षात आले. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तत्काळ कंपनीचे उत्पादन थांबवले. त्यामुळे उशिरा ही दुर्गंधी कमी आली. कंपनीने उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आल्याचा दावा केला. यावेळी भाजप पदाधिकारी देखील धावून आले. जयगड आणि खेड लोटे येथील कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यात काल रात्री आठ ते नऊच्या सुमारास अचानक साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स, एमआयडीसी परिसरामध्ये दुर्गंधी पसरली. नाक धरून जावे लागत होते, एवढा घाण वास हवेत पसरला होता.
वायू गळती तर नाही ना, अशी भीती ग्रामस्थांमध्ये पसरली. सर्वांनी एमआयडीसीमध्ये जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसेना शहर संघटक आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्यासह अनेकांनी चौकशी केली, तर हा वास वायू गळतीचा नसून तेथील एका कंपनीतील असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तत्काळ कंपनीच्या मॅनेजरला फोन केला. कंपनीच्या चिमणीतून मोठ्या प्रमाणात वास बाहेर जात होता. त्यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने तत्काळ उत्पादन थांबवले. त्यामुळे हळूहळू दुर्गंधी कमी झाली, अशी माहिती मलुष्टे यांनी दिली. दरम्यान, भाजपचे काही पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीदेखील कंपनीत जाऊन चौकशी केली; परंतु ही वायू गळती नसून कंपनीतील दुर्गंधी असल्याचे उघड झाले. कंपनीने उत्पादनच थांबविल्याने हवेत पसरलेली दुर्गंधी कमी झाली. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची खबरदारी कंपनीने घ्यावी, अशा सूचना शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ऑक्टेल कंपनीतून दुर्गंधी नाही – दुर्गंधीबाबत मला रात्री नऊ वाजता समजल्यावर लगेच कंपनीत आलो. उत्पादन सुरू असलेल्या ठिकाणी तपासणी केली; परंतु आम्हाला कोणालाही वास आला नाही. पहिल्यांदा आमच्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास व्हायला हवा होता. खबरदारी म्हणून संपूर्ण प्लांटची पाहणी केली; मात्र आमच्या कंपनीतून दुर्गंधी येत असल्याचे आढळले नाही. आमच्या कंपनीतून हायनॅक्शिन रेझिनचे उत्पादन घेतले जाते. पाणी शुद्धीकरणासाठी त्याचा वापर होतो. हा माल निर्यात केला जातो. रिफायनरी, एमएसईबी, आदी ठिकाणी त्याचा वापर होतो, अशी माहिती ऑक्टेल कंपनीचे मॅनेजर संजय साळवी यानी दिली.

