कोकण आणि कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. पण काही ठिकाणी असणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळे अनेकदा पर्यटकांमध्ये नाराजगी दिसून येते. काही ठिकाणी अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात आढळल्याने पर्यटकानी त्या स्थळांकडे पाठ फिरवली आहे. रत्नागिरीला लाभलेले समुद्र किनारे सुद्धा विशाल असल्याने त्यामुळे अनेक पर्यटक विकेंडला दाखल होत असतात, त्यामुळे रत्नागिरीमधील अनेक पर्यंटन स्थळाच्या सोयी सुविधांसाठी केंद्रीय मंत्री उदय सामंत सतत प्रयत्नशील राहतात.
रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत रत्नागिरी तालुक्याला ५ कोटी चा निधी प्राप्त झाला असून ह्या निधीमुळे रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांचे रूपडे पालटणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ना. उदय सामंत ह्यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयस्तरावर बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यटनमंत्री मा. ना. आदित्यजी ठाकरे ह्यांच्याकडे सदर निधी मिळण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी उपलब्ध झाला आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीपैकी रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील रत्नदुर्ग किल्ला पायथ्याशी असलेल्या उद्यानात शिवसृष्टी विकसित करण्यासाठी २ कोटी रुपये, भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी १ कोटी रुपये तसेच आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी १ कोटी रुपये तसेच श्री क्षेत्र पावस येथील परिसरातील विकास कामांसाठी १ कोटी रुपये असा एकूण ५ कोटी निधी वितरित करण्यात आला असून ह्या निधीमुळे या पर्यटनस्थळांन एक प्रकारे लकाकी येणार आहे.