रत्नागिरी शहरामध्ये कित्येक दिवस सुरु असलेले पाणी पाईपलाईनचे काम अखेरीस संपुष्ट आले असून जून महिन्यापासून पाण्यासाठी वेगळे मिटर बसविण्यात येणार आहे. ज्यामुळे जेवढे पाणी वापरले जाणार तेवढ्याच पाण्याचे रीडिंग त्या मीटरवर दाखवण्यात येणार आणि त्यानुसारच पाणीपट्टी भरून घेतली जाणार आहे.
रत्नागिरीत जून पासून पाण्यासाठी नवीन मीटर कार्यान्वित झाल्यानंतर मात्र नवीन दरानुसार पाणीपट्टी सुरु झाल्यानंतर मनसोक्त पाणी वापरणार्यांना अधिकची पाणीपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्याप्रमाणेच पाण्याचा वापरही काळजीपूर्वक रित्या केला जाण्यास मदत होणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यास एक प्रकारे मदत होणार आहे.
तसेच पाणी मीटरनुसारच वापरलेल्या पाण्याचे पाणीपट्टीची बिले वितरीत केली जाणार आहेत. रत्नागिरी शहरात १० हजार २८८ च्या दरम्यान नळजोडण्या केलेल्या आहेत. सध्या जलमापक किंवा मीटर नसल्याने कोणीही कितीही पाणी वापरले तरी प्रतिमहा दिडशे रुपये इतकीच पाणीपट्टी येत आहे. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर करणार्याला आळा बसणार आहे किंवा त्यानुसार बील आकारले जाणार आहे.
एकाचा भुर्दंड दुसऱ्याला नाहक होणे आता पूर्णपणे बंद होणार आहे. आता अनेक भागांमध्ये नूतन मीटर यंत्रणा बसवली जाऊ लागली आहे. मे महिन्यापर्यंत सर्व मीटर बसवून पूर्ण होतील आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर जून महिन्यापासून नवीन दराने पाणीपट्टी येणार आहे. नवीन दरानुसार १ हजार लीटरला ८ रुपये इतकी पाणीपट्टी निश्चित करण्यात आली आहे. जे ग्राहक धो धो पाणी वापरत आहेत त्यांच्यावर पाणी वापराच्या मर्यादा येणार आहे.