ग्रामीण भागामध्ये असो अथवा शहरी भागामध्ये असो, आठवडा बाजार भरतोच. कोरोना काळामध्ये खरेदीसाठी उद्भवणारी गर्दी लक्षात घेता, शासनाने आठवडा बाजार भरविण्यास बंदी घातली. इतर जिल्ह्यांसह रत्नागिरीतील आठवडा बाजार निर्बंध घातल्याने अनेक महिने बंद आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू, ताजा भाजीपाला, फळे, इतर घरातील वस्तू यांच्या विविध दरातील आणि प्रकारातील वस्तू आठवडा बाजारामध्ये उपलब्ध असतात.
आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली असल्याने शासनाकडून अनेक निर्बंध उठविण्यात आले असून, अनेक बाबी सुरु करण्यास समर्थता दाखविली आहे. त्यामुळे निर्बंध कमी केल्यावर मॉल्स, हॉटेल, नाट्यगृहे, सिनेमागृहे व बाजारपेठा सुरु करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यासह शहरात येणारा भाजीपाला हा मुख्य करून पश्चिम महाराष्ट्रातून येतो, त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात आठवडा बाजार भरतात, त्याठिकाणी नागरिकांना चांगल्या प्रकारची भाजी व अन्य उत्पादने स्वस्तात मिळू शकतात. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर जिल्ह्यात अनेक भागात आठवडा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी असणारी कोरोनाची भयावह असणारी स्थिती आता आटोक्यात आली असल्याने स्थानिकांकडून आठवडा बाजार लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
पूर्वी रत्नागिरीमध्ये दोन ठिकाणी वेगवेगळ्या वारी आठवडा बाजार भरवला जात असे. त्यामध्ये मंगळवारी आयटीआय जवळ आणि शनिवारी आठवडा बाजार परिसरामध्ये असे दोन दिवस आठवडा बाजार भरत होते. परंतु मागील दीड वर्षे आठवडा बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. आता मोठय़ा प्रमाणावर मागणी असलेला आठवडा बाजार तातडीने सुरू करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.