माझ्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी गेल्या ३९ वर्षांमध्ये कोकणात काय केले ते सांगावे. मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय मंत्री, घरात खासदारकी, आमदारकी एवढी पदे असून तुम्ही काय दिले? राज्यात सर्वांत जास्त संवेदनशील असलेल्या गडचिरोलीनंतर त्यांच्या काळात दुसरे संवेदनशील जिल्हे कोणते असतील, तर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परंतु मी गेल्या १० वर्षांमध्ये विकास कामांबरोबर कोकणची संस्कृती आणि विचार टिकवण्याचे काम केले. म्हणून आज दोन्ही जिल्ह्यांत एकही संवेदनशील केंद्र नाही, असा टोला महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राणे यांना हाणला.
श्री. राऊत यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे साडेसहा हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दखल केला. यावेळी मराठा भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बसायला जागा नसल्याने हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरही तेवढीच गर्दी होती. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणात राणे आणि महायुतीचा समाचार घेतला. अरे, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला. आता फक्त मशाल… मशाल आणि मशाल… अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात रणरणत्या उन्हामध्ये जिल्हा परिषदेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज भरण्यात आला.
यावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊत म्हणाले, खासदार म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केले आहे. कोकणची संस्कृती आणि विचार टिकवून ठेवले आहेत. कोकणातील सर्वसामान्यांचा आशीर्वाद हेच आमचे वैभव आहे. म्हणून आतापर्यंत १०७ सभा घेऊन लोकांपर्यंत पोहोचलो आहे. महिन्यातील पंधरा ते वीस दिवस मी मतदरसंघात असतो आणि १४ तास जनतेसाठी काम करतो.