कोकणातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, मात्र जिल्हा, बदल्यांमुळे शिकवायला शिक्षकच उरले नाहीत. तात्पुरत्या शिक्षकांना शिकवायला घेतले, त्यांनाही आठ दिवसांत घरी बसवले. त्यामुळे यापुढे शिक्षक भरती करताना स्थानिकांना आधी संधी द्या, मग इतर जिल्ह्यातील उमेदवारांना द्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. शिक्षणमंत्र्यांच्या कोकणातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक मिळेनात, अशी स्थिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १८०३ जागा रिक्त आहेत. कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जि. प. शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे.
सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जि. प. च्या शाळांची गुणवत्ता 9 घसरत आहे. याबाबत आ. जाधव यांनी अधिवेशनात आवाज उठवला. रत्नागिरी जिल्ह्यात जि. प. शिक्षकांची १३०० पदे रिक्त होती. अशावेळी शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्य स्तरावरून काढण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या, तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी या बदल्या थांबवल्या. मात्र जि.प.वर प्रशासकीय राज येताच पुन्हा ७६३ जणांना सोडण्यात यावे, असे आदेश , राज्य स्तरावरून देण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाळा बिगरशिक्षकी झाल्या आहेत. एकशिक्षकी शाळाही अनेक आहेत. त्यांचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आ. जाधव यांनी मांडली.
या शाळांवर स्थानिक डीएड्, बीएड्, पदवीधारकांना घेण्याचा निर्णय घेतला. परंतु याची अंमलबजावणी होते न होते तोच सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यामुळे नेमलेल्या स्थानिक शिक्षकांना ८ दिवसांत कामावरून थांबवल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कोकणातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर कोकणासाठी स्वतंत्र जाहिरात काढा. स्थानिकांना त्यात प्राधान्य द्या. बिंदूनामावलीनुसार उमेदवार नाही मिळाले, तर त्या जागा इतर प्रवर्गासाठी रुपांतरित करा, अशी मागणी आ. जाधव यांनी केली. याबाबतची नोंद आपण घेतली असून त्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.