राजापूर तालुक्यामध्ये होणारा रिफायनरी प्रकल्पासाठीचा विरोध आता मावळत चालला असून, तो राजापुरमध्येच होण्यासाठी समर्थन वाढले आहे. अनेक पक्षाचे नेते, ग्रामस्थ यांची समर्थन करणाऱ्यांचे गट बनत आहेत. रिफायनरी प्रकल्प राजापुरमध्येच व्हावा, यासाठी रिफायनरी समर्थक संघटनेच्या वतीने कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, सचिव अविनाश महाजन, सल्लागार सीए.निलेश पाटणकर तसेच सदस्य मिलिंद दांडेकर हे उपस्थित होतेत. ही भेट दिल्लीतील उद्योग भवनमधील कार्यालयात झाली.
नारायण राणे यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागल्याने कोकणवासीयांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे राणे यांनी सुद्धा रिफायनरी समर्थकांचे सर्व व्यवस्थित ऐकून घेऊन, यासाठी सामंजस्याने तोडगा काढू व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कोकणवासीयांना भविष्यात रोजगार उत्पन्न होण्याच्या दृष्टीने रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच सुरु करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या भेटीदरम्यान स्थानिकांना रोजगार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास, शैक्षणिक व आरोग्य सुविधा यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतो, याबाबतचे कागदोपत्री विस्तृत सादरीकरण ना. राणे यांना केले.
हि चर्चा साधारण एक तास सुरु होती असून, मागील चार वर्षातील विविध समर्थक संघटनांद्वारे केलेली आंदोलने, मोर्चे, स्थानिक शेतकरी यांनी दिलेली सुमारे ८५०० एकर जमिनीची प्रकल्पा साठी दिलेली संमतीपत्रे, विविध गावांनी व संघटनांनी रिफायनरी समर्थनाचे ठरावाबाबतची सविस्तर माहिती सांगण्यात आली. त्याचप्रमाणे रिफायनरी प्रकल्पामुळे निर्माण होणार्या असंख्य पूरक उद्योगासाठी लगतच्या बारसु सोलगाव येथील प्रकल्पानाही चालना मिळावी, जेणेकरून रिफायनरी प्रकल्पाशी निगडीत उद्योग धंद्यांमुळे इतर रोजगार निर्मिती होऊन, कोकणच्या विकासाची एक साखळी तयार होईल, अशी मागणीही त्यांना करण्यात आली.