पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम यंदा ३१ मे रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्ससीननेट नौका बंदरातील जेटींवर शाकारून ठेवण्यासाठी १० मे पासूनच सुरुवात झाली. यावर्षी २१ नौका जेटींवर पूर्णपणे बंदिस्त करून शाकारून ठेवल्या आहेत; परंतु यामुळे इतर नौकांना जेटीवर येऊन मासळी उतरवणे फारच जिकिरीचे बनले आहे. पर्ससीननेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांची प्रत्यक्षात भेट घेऊन याबाबत तक्रार केली. इतर नौकांना जेटी मोकळी करून देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मिरकरवाडा बंदराचे नियंत्रण करणाऱ्या मिरकरवाडा प्राधिकरणाच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांना कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार शाकारून ठेवण्यात आलेल्या नौकामालकांना जेटीवरील नौका हलवून भगवती बंदरात उभ्या करण्यास सुचवण्यात आले.
नोटीस देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पर्ससीननेट रत्नागिरी तालुका मालक असो.चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, सेक्रेटरी जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, वीरेंद्र नार्वेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांची भेट घेतली. नोटीस देऊनही शाकारून ठेवलेल्या नौका जेटीवरून न हलवणाऱ्या नौका मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
‘बंदी’साठी अजून २० दिवस – जिल्ह्यात सुमारे २७५ पर्ससीननेट नौका आहेत. बहुसंख्य नौका मिरकवाडा बंदरातील आहेत. त्यामुळे ज्यांचा यंदाचा मासेमारी हंगाम चांगला गेला आहे, त्यांनी १० मे पासूनच आपल्या नौका शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी मासेमारी बंदी सुरू होण्यास अजून २० दिवस असतानाही नौका शाकारून ठेवून जेटी अडवण्यात आली आहे. ती मोकळी करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.