रायगड जिल्ह्यात महा आघाडीच्या पक्षाच्या स्थापनेपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरूच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना आमदारांची याबाबत जाहीरपणे नाराजगी दिसून आली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता.
पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेना आमदारांना विश्वासात घेण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या होत्या. माणगाव निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरच रोखले होते. यामुळे आता दोन्ही पक्षांतील वाद अधिकच विकोपाला गेले आहेत. खासदार सुनील तटकरेंनी शिवसेनेवर जाहीर टीका केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे तिन्ही आमदार आता तटकरें विरोधात एकत्र आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जतच्या आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्वरित रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हटवावे अशी थेट मागणी केली आहे. माणगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परीषद घेऊन थेट पालकमंत्री बदलण्याचीच मागणी केली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी पद्धतीने कारभार करत असून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात लुडबुड करत आहेत. कोणाशीही चर्चा मसलत न करता, त्या परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करत आहोत.
रायगडच्या पालकमंत्र्यांना बदला या मागणीबद्दल आम. भरत गोगावलेसह इतर आमदारांनी शिवसेनेचे वरिष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कडेही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात कुरघोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.