रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे येथील पाटीलवाडीत पहाटेच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले. विहिरीमध्ये पिंजरा टाकून त्याला बाहेर काढण्यात यश आले. सुमारे सात तासांहून अधिक काळ बिबट्या विहिरीत राहिला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. पाटीलवाडी येथील मधुकर पाटील यांच्या दरवाजामध्ये असलेला कुत्रा रात्री गायब झालेला होता. त्याला बिबट्याने भक्ष्य केल्याचा अंदाज पाटील यांनी बांधला होता; मात्र सकाळी उठल्यानंतर पाटील यांना घराजवळील विहिरीतून आवाज येऊ लागला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर आतमध्ये बिबट्या पडल्याचे दिसून आले. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा त्यांनी अंदाज बांधला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसपाटील आदिती लाड यांच्याशी संपर्क साधला.
लाड यांनी वनविभागाला कळवले. वनविभागाचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे बिबट्या तरंगत राहण्यासाठी उड्या मारत होता. त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीमध्ये पिंजरा सोडला. काहीवेळानंतर पाण्यातील बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात दाखल झाला. त्यानंतर पिंजरा बाहेर काढण्यात आला. मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या आठ वर्षांचा होता. वैद्यकीय तपासणी करून वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
गावडेआंबेरीतील नागरिकांना दिलासा – गेले अनेक दिवस बिबट्याचा या परिसरामध्ये वावर होता. काहीवेळा पाळीव प्राण्यांवरही बिबट्याने हल्ले केले होते. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर बिबट्या विहिरीत पडल्यामुळे आपसूकच वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. त्याला पकडून अन्यत्र सोडण्यात आल्यामुळे पावस परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.