गुहागर तालुक्यातील अंजनवेल-दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचा रेल्वे जवळचा वीज खरेदी करार संपुष्टात आल्याने गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. शेवटचे २४० मेगावॅट पर्यंतची वीज पुरवून आर्थिक वर्षाच्या मध्यरात्रीपासून टरबाइनची धडधड थांबली आहे. नवीन करारासाठी कंपनीच्या वतीने प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जोपर्यंत कमी दरामध्ये नॅचरल गॅस उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज निर्मिती अशक्य आहे. तर पुढील १ महिन्यासाठी विजेची मागणी होण्यासाठी शक्यता आहे. अशी माहिती आरजीपीपीचे एचआर जॉन फिलिप्स यांच्याकडून मिळाली आहे.
१ एप्रिल २०१७ पासून ते मार्च २०२२ पर्यंत पाच वर्षाकरता हा करार करण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात गॅसवरील सबसिडी बंद करण्यात आल्याने तयार होणारी वीज महाग होत गेली. परिणामी रेल्वे कडील विजेची मागणीच कमी करण्यात आली होती. शेवटच्या स्टेजमध्ये दिवसाला २५० ते ३०० मेगावॅट मागणीनुसार वीज निर्मिती केली जात होती. करार संपुष्टात येत असताना व कमी दरामध्ये वीज निर्मिती होत नसल्याने कोणताही नवीन वीज खरेदीचा करार करण्यात आला नाही. शेवटी गुरुवारी ३१ मार्च रोजीच्या मध्यरात्री आरजीपीपीएल कंपनीची वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली.
याचे मुख्य करण म्हणजे नॅचरल गॅस कमी दरामध्ये उपलब्ध होत असल्याने सुरुवाती पासूनच आरजीपीपीएल कंपनीला वीज निर्मितीसाठी तारेवरील कसरत करावी लागत होती. केंद्र सरकारने गॅस वरील सबसिडी देऊन रेल्वे साठी ५०० मेगावॅट वीजनिर्मितीचा करार करून आरजीपीपीएल कंपनी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारकडून कमी दरामध्ये गॅस उपलब्ध झाला तरच नवीन वीज निर्मिती शक्य आहे. परंतु, इतर ठिकाणाहून गॅस घेऊन निर्माण करायचे म्हटले तर, वीज महाग ठरत आहे. महागडी वीज रेल्वेला खरेदी करणे शक्य नाही यामुळे प्रथम केंद्र सरकारने कमी दराचा गॅस पुरवठा करावा आणि विजेचा करार करावा यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहे. यासाठी दिल्ली येथे कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.