करोडोंचा निधी खर्च होऊनही कुंभार्ली घाटात काही ठिकाणी रस्ता तुटला आहे. मात्र या ठिकाणी बांधकाम विभागाने रिकामे बॅरल ठेवून केविलवाणी खबरदारी घेतली आहे. मात्र या विरोधात रस्ता तुटलेल्या ठिकाणी मनसेचे वाहतूकसेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दगडाने भरलेले बॅलर, झेंडे आणि पट्टे लावून सावधानतेने प्रवास करण्याचे सूचित केले आहे. तर करोडोचा निधी घाटात खर्ची घालणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त ठिकाणी दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला लवकरच जोरदार दणका देण्याचा इशारा राजू खेतले यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यन्त अवघड असणारा कुंभार्ली घाट राज्यातील महत्वाच्या घाटामध्ये नोंदला गेला आहे.
या घाटावर दरवर्षी लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च होत असतात. मात्र तरीही घाटाचे भोग मात्र सरत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. अवघड घाटात ३ ते ४ ठिकाणी रस्ता तुटला आहे. गत कित्येक दिवस तुटलेल्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम बांधकाम खात्याने कोणतीही काळजी घेतली नव्हती. दोन गाड्या जर एकमेकांना घासून गेल्या तर तुटलेल्या रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. खाली हजारो फूट खोल दरी आहे. अशा वेळी काही दिवसांपूर्वी फक्त रिकामे बॅरल ठेवण्यात आले होते. प्रवाशी आणि वाहनधारकांच्या तक्रारीनुसार मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि पदाधिकारी यांनी जाऊन घाटातील रस्त्याची पाहणी केली आणि धक्कादायक वास्तव समोर आले.
तात्काळ वाहतूक संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, खेर्डी शाखाध्यक्ष प्रशांत हटकर, संजय वाजे, आशिष गजमल, विकास म्हादम, कल्पेश म्हादम, नरेंद्र म्हादम, चम्या म्हादम, आदित्य तंबीटकर, निरंजय म्हादम, प्रतीक आंग्रे आदींनी दगडाने भरलेले बॅरल, मनसेचे झेंडे, मनसेचा पट्टा लावून धोकादायक ठिकाणी वाहनचालकांना सावधानतेने गाडी चालवण्याचे सूचित केले आहे. जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटात अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या संदर्भात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाटावर होणारा खर्च, अनावश्यक बांधलेल्या भिंती आणि गरज आहे त्या ठिकाणी न घेतलेली काळजी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करून एप्रिल, मे पासून अशी अवस्था या ठिकाणी झाली असताना त्यासंदर्भात का काळजी घेतलो नाही? असा सवाल करून सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे उत्तर द्यावेच लागेल. लवकरच मनसेचा दणका संबंधित यंत्रणेला देणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.