रत्नागिरी शहरात लाखो रुपये खर्च करून नगर परिषदेकडून राबविण्यात येणार्या नव्या नळपाणी योजनेच्या कामाबाबत आणि त्याच्या “उत्कृष्ट” दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारी येतच आहेत. त्यात आता रत्नागिरी नगरपरिषदेचे नियोजन व विकास समितीचे सभापती विकास पाटील यांनी नळपाणी योजनेच्या कंत्राटदाराच्या अपुऱ्या कामाबाबत पाढाच वाचला असून, त्याबाबत नाराजी व्यक्त करुन आज जिल्हाधिकार्यांना लेखी पत्र दिले असून कामाची वेळेत पुर्तता झाली नाही तर, कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत तसेच काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदाराची अनामत रक्कम देखील जप्त करण्याचे आदेश द्यावेत अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. विकास पाटील यांनीच ही मागणी केल्याने एक प्रकारे नगर परिषदेला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.
त्यासोबतच आता उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी सुद्धा समान मागणी लावून धरली आहे. नगर पालिकेच्या विस्तारित नळपाणी योजनेच्या कामातील दिरंगाईचा फटका थेट उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांना बसला आहे. नागरिकांच्या रोषाला विनाकारण उपनगराध्यक्षाना सामोरे जावे लागत आहे.
प्रभाग क्र. १ मध्ये पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आहे. केवळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करून ठेवलेले आहे. रस्त्याची कामे अपूर्ण स्वरुपात आहेत. शहरातील खालच्या भागातील विकास कामांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल जात आहे. या भागात माणस रहात नाहीत का? असा जळजळीत सवाल उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करत नळपाणी योजनेच्या ठेकेदाराचे बील रोखा, अशी थेट मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पाणी योजनेच्या ठेकेदाराने ही कामे तत्काळ पूर्ण करावी, अन्यथा त्याची अनामत रक्कम जप्त करून घेण्याचे आदेश आपण द्यावेत अशी मागणी केली आहे.