दापोली मुरुडमधील मागील वर्षापासून चर्चेत असलेले साई रिसॉर्टच्या प्रकरणामध्ये मालकाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र कारवाईची नोटीस मिळल्यावर न्यायालयात दाद मागण्याची मुभा खंडपीठाने दिली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कथित मालकीचे असलेल्या साई रिसॉर्टवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून ते अवैध असून पाडण्यासाठी आंदोलन केले होते. यावर कारवाई करण्याची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
राजकीय पक्षांच्या वादामध्ये नाहक माझ्या मालमत्तेचे नुकसान होत आहे, असा आरोप कदम यांनी याचिकेत केला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे. सोमय्या यांनी देखील उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी याचिका केली असून, न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मालक कदम यांना कारवाईपूर्वी कल्पना द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संबंधित समुद्रकिनारी असलेले रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे असून, पालकमंत्री असताना तयी पदाचा गैरवापर करून आणि पर्यावरण पूरक नियमांचे पालन न करता बांधण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने तूर्तास कारवाईबाबत कोणताही अंतरिम आदेश दिला नाही आहे; मात्र मालक कदम यांना जेव्हा कारवाईबाबत नोटीस येईल, त्यावेळी न्यायालयात दाद मागण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. त्यामुळे या राजकारणी नेत्यांच्या भांडणामध्ये नाहक माझा आणि माझ्या वास्तूचा बळी जात असल्याची भूमिका मालक कदम यांनी घेतली आहे.