काल १० सप्टेंबर रात्री मुंबई साकीनाका परिसरामध्ये टेम्पोत एका ३२ वर्षीय महिलेवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणी पीडित महिलेचा आज ११ सप्टेंबर उपचारा दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. पीडित महिलेवर घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते, परंतु, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा निर्दयी प्रकार घडला आहे. या प्रकाराने अख्खी मुंबई पुन्हा एकदा हादरुन निघाली आहे.
पिडीत महिलेची प्रकृती गंभीर होती, तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घडलेल्या भयानक आणि अमानवी प्रकाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन त्यात तिचा मृत्यू होणं हे निर्घुण कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्यात येईल. यासंदर्भात माझे राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोलणे झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी ते बोलले आहेत. झालेली घटना हि अतिशय निंदनीय असून, असे अमानवी कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोर शासन केले जाईल. तसेच या संदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे आदेश दिल्याचेही सांगितले.