लोकसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांना शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाची ऑफर होती. त्यानुसार त्यांनी पक्षप्रवेशाची तयारीही दर्शवली होती; मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेतून त्यांनी प्रवेश केला नसावा असे सांगत आमदार किरण सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेमध्ये (उबाठा गट) नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे; मात्र, त्यांच्या या लांबलेल्या भाजपप्रवेशाबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असताना आमदार सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वेगळाच दावा केला. सामंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर होती. राजन साळवी येतो म्हणून देखील सांगत होते; पण, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल, असा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसावा.
राजन साळवी यांच्या अस्थिर राजकीय भूमिकेमुळे माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत जाण्यासाठी कुणीही तयार नाही; मात्र, राजन साळवी यांनी पक्षांतर केल्यास ते ज्या पक्षात जातील त्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात येतील. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार साळवी शिवसेनेमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या भेटीच्यावेळी चर्चा करताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे साळवी शिवसेना सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच, गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. मात्र, त्याला साळवींसह भाजप नेतृत्वाकडून अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.