आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यात भेट होऊन महत्वपूर्ण चर्चा निवडणुकांबाबत झाल्याचे समजते. दोघांच्या भेटीचा फोटोसुध्दा प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या बॅनरखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत सेनेचे वर्चस्व होतं. पूर्वी १५ प्रभाग होते आणि नव्याने पूर्वीचा ५ व ६ प्रभागामधील काही भाग घेऊन ७ नं. हा नवा प्रभाग अस्तित्वात आला. या दोन्ही जुन्या प्रभागातील नवलाई नगर, नरहर वसाहत, अभ्युदय नगर, तर तिकडे रेडिओ कॉलनी, पोस्ट ऑफिसचा काही भाग वाईन मार्ट, शिवाजीनगर असा काही भाग घेऊन नवीन ७ नं. प्रभाग झाला.
रत्नागिरी नगरपालिकेचा विचार करता महायुती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे तसे शहरात फारसे वर्चस्व किंवा संघटन नाही. पण भाजपाचे हक्काचे ६ ते ७ नगरसेवक २ आणि ३ नं. प्रभागातून निवडून येतात. आता महायुतीचा विचार करता भाजपा सेनेजवळ असलेले विद्यमान प्रभाग वगळून उर्वरित जे राहतील त्यामध्ये जागांची वाटणी करायची की ज्यांचा ज्या प्रभागात प्रभाव आहे, त्या पक्षाला तेथे आपला उमेदवार द्यायचा, याबाबतचा निर्णय तसा अवघड आहे. त्यामुळे भाजपा किती जागांची मागणी करतो आणि कोणत्या? त्यावरती सारं अवलंबून आहे. जिल्हा परिषदेचा विचार करता मावळत्या सभागृहात ५५ पैकी एकही भाजपचा सदस्य नाही. ३९ पूर्ण सेना असताना, १६ राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ काँग्रेस असं होते. त्यामुळे जि.प.ने जागा वाटपातसुध्दा विद्यमान सेनेचे सदस्य जे आता शिवसेना शिंदेगटात आहेत. ते जवळपास २४ च्या आसपास आहेत.
पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर आणखी येतील, पुन्हा पूर्वीचे इच्छुक असलेले, त्यांना संधी, अशा अनेक बाबी आहेत. त्यामुळे भाजपासोबत युती करताना तेथेही जागांची आकडेमोड कशी होईल, त्यावरती सारं अवलंबून आहे. मात्र पालकमंत्री ना. उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दोघेही समजस नेते म्हणून ओळखले जातात. पण यामध्ये पुन्हा खा. नारायण राणेंची भूमिका काय असेल तेसुध्दा महत्वाचे आहे. दरम्यान सध्यातरी महायुतीच्या बॅनरखाली निवडणुका होतील, असे एकंदरीत दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे वाटत आहे.