भाजपमध्ये नव्या जबाबदाऱ्या दिल्यानंतर एक गट नाराज झाला आहे. त्यांच्या काळात ज्यांनी त्रास दिला त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी या नाराज गटाने ठेवली होती. त्यामुळे पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गैरहजर असल्याचे दिसत होते. ही दुही कमी होते न होते तोवर भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक मयेकर यांची भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले; परंतु या भेटीमुळे कोणीही कुठेही जाणार नाही, असा खुलासा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व पक्षात नाराज असलेले माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या घरी जाऊन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रात्री भेट घेतली.
सुमारे दीड तास ही चर्चा झाली. सामंतांच्या अचानक भेटीमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले. त्यांच्या नाराजीच्या चर्चाही रंगल्या. भाजपमधील एक गट नाराज आहे, त्यावर मात्र भाजपचे पदाधिकारी बोलण्यास तयार नाहीत. त्या गटाच्या तळ्यात मळ्यातील भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण येत आहे. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर हे अजातशत्रू व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मागील पाच वर्षे ते सत्ताकारणापासून दूर आहेत. त्यांनी आपल्या भाच्यांना राजकारणामध्ये संधी उपलब्ध करून दिली. मागील दीड-दोन महिन्यात भाजपच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीत फेरबदल केले. हे फेरबदल करताना रत्नागिरी बाजारपेठेत वर्चस्व असणाऱ्या मयेकर यांना बाजूला ठेवण्यात आले.
त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या मुलाला भाजप युवा संघटनेचे पद देण्यावरूनही टाळाटाळ करण्यात आली. त्यांच्या मुलाऐवजी अन्य तरुणांवर ही जबाबदारी दिली गेली. मयेकर यांना मानणारा रत्नागिरीत मोठा वर्ग आहे. त्याचा परिणाम रत्नागिरी शहरात भाजपच्या गणितावर होऊ शकतो. पक्षांतर्गत घडामोडी घडत असताना मयेकरांची पालकमंत्री सामंत यांनी भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. शहराच्या होणाऱ्या विकासासह अन्य मार्गदर्शनपर चर्चाही झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती; परंतु या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढला जाऊ नये. आम्ही भाजपचे निष्ठावंत आहोत, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.