मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी उपोषण मागे घेतले. आमरण उपोषणाला बसल्याने त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास जाणवू लागला. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण औषध सुद्धा घेणार नाही असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर, त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार संभाजी राजे यांना मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
मंत्री शिंदे म्हणाले की, खासदार संभाजीराजे यांनी एकूण सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण करून दिल्या आहेत. या सर्व मागण्या ठराविक कालावधीमध्ये मार्गी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. या मागण्यांमध्ये मराठा समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास या संस्थेमधील रिक्त असणारी पदे १५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्यात येणार आहेत. सारथीचे व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून, २०२२ पर्यंत त्याची पूर्तता करण्यात येणार आहे.
सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्र उभारणीसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च, २०२२ पर्यंत मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आणखी २० कोटी, तसेच पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटींचा निधी देणार आहे. त्याचप्रमाणे, व्याज परताव्याबाबत कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देण्यात येणार आहे. या विशेष मागण्यांचा समावेश आहे. संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं. मात्र, आता माझ्याही चेहऱ्यावर हास्य आलं आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच राज्यातील सर्व मराठा संघटनांचे आभार मानले.