राज्यात राजकारणात झालेल्या उलथापालथी नंतर शिंदे आणि फडणवीस सरकार दणक्यात स्थापन झाले. परंतु, ४० अधिक आमदारांनी दगा दिल्याने महा विकास आघाडीचे सरकार पायउतार झाले त्यामुळे शिवसेनेची एक प्रकारे नामुष्की झाली. संजय राऊत यांनी देखील सामनामधून नवीन सरकार आणि बंडखोरांवर कडाडून टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. फडणवीस व एकनाथ शिंदे कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे व उठण्याआधी परत यायचे अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते.
आता दोनशे जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे.
मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना नारायण राणे, छगन भुजबळ वगौरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.