भारत सरकारने आर्म अॅक्ट १९५९ नुसार नागरिकांना शस्त्र परवाना घेण्याची सुविधा काही अटींसह देण्यात आली आहे. पोलीस, सेना दल, सुरक्षा एजन्सीमध्ये काम करणाऱ्याना शस्त्र परवाने घेता येतात त्याच प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा शस्त्र परवाना घेण्याची सुविधा आता शासनाने अटी शर्थीसह उपलब्ध करून दिली आहे.
कोणत्या कारणासाठी शस्त्र परवाना हवा आहे यांचे कारण मात्र त्या व्यक्तीला स्पष्ट करावे लागणार आहे. तुमचे प्रोफेशन, कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्यास किंवा अन्य कोणत्या महत्वाच्या कारणासाठी शस्त्र परवाना घेता येतो, त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. परवाना मिळविण्यासाठी प्रथम जिथे वास्तव्याला आहात तेथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावा लागतो.
अर्ज केल्यावर तुमची चौकशी करून हा अर्ज पोलीस निर्देशनालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर स्थानिक पोलीस तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करून तो अर्ज गुन्हा अन्वेषण विभागाकडे पाठवितात. तेथेही संपूर्ण पडताळणी पार पडल्यानंतर तो अर्ज पुन्हा जिल्हा एस.पी कार्यालयामध्ये येतो. त्यानंतर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठविण्यात येतो आणि सर्व कागदपत्रांची केलेली पडताळणी पाहून तुम्हाला शस्त्र परवाना द्यायचा वा नाही याचा अंतिम निर्णय घेण्यात येतो.
अर्ज करताना तुमचे वय, पत्ता, चरित्र प्रमाणपत्र, कमाई, संपत्तीविषयी माहिती, कर्ज असल्यास त्याची माहिती, नोकरी-व्यवसाय माहिती, मेडिकल प्रमाणपत्र, इत्यादी माहिती द्यावी लागते. निशाणेबाज खेळाडूंसाठी हि माहिती सविस्तर द्यावी लागते तर सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्या व्यक्तींना संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते.
त्यामध्ये सुद्धा शस्त्र खरेदी हि दोन प्रकारची असते. एक प्रोहीबिटेड आणि दुसरी नॉन प्रोहीबीटेड. पहिल्या प्रकारामध्ये २२ बोर रिव्होल्व्हर, ३१२ बोर रायफल, पिस्तुल अशी शस्त्रे विकत घेता येतात तर दुसऱ्या प्रकारामध्ये ३०३ रायफल, ९ एमएम पिस्तुल, मशीनगन, एके ४७ अशी शस्त्रे विकत घेता येतात. दुसऱ्या प्रकारामध्ये मोडणारी शस्त्रे सर्वसामान्य नागरिकांना विकत घेण्याची परवानगी नसते.
जेंव्हा शस्त्र खरेदी केली जाते तेंव्हा गोळ्या खरेदीसाठी देखील अर्ज करावा लागतो. एका वेळी एकूण १०० गोळ्यांची खरेदी करता येते आणि वर्षातून २०० गोळ्यांची खरेदी करता येते. जितक्या गोळ्या संपल्या त्यासाठी अगोदरच्या गोळ्यांचा हिशोब द्यावा लागतो आणि मगच नवीन खरेदी करता येतात.