रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका दाम्पत्यानं कोरोना काळात मुंबईतील नोकरी सोडून स्वत:चा शेती व्यवसाय सुरु केला. दापोलीमधील शिवाजीनगर भागातील योगेश शंकर गावडे आणि योगिता गावडे या दाम्पत्यानं गावी येत हळदीची शेती सुरु केली. अन् काही महिन्याच्या काळामध्येच त्यांना यामध्ये यशही प्राप्त झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, काहींनी त्यावर हार न मानता, शून्यातून सुरुवात करून नवीन काहीतरी करून दाखवले.
हळद लागवडीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. दापोली तालुक्यातील साखळोली जवळ शिवाजीनगर येथील योगेश गावडे या शेतकऱ्याने ३ गुंठे क्षेत्रावर हळदीची सेंद्रिय शेती केली आहे. सेलम सुधारित जातीच्या हळदीची लागवड या शेतकऱ्याने केली आहे.
दापोलीमध्ये शिवणारी, कोळबांद्रे, सडवे, साखळोली व शिवाजी नगर असे ५ गावात मिळून जवळपास ६० ते ६५ शेतकऱ्यांनी सेलम जातीच्या हळदीची शेती केली आहे. रानटी प्राणी, माकड-वानरांपासून संरक्षण पीक म्हणून हळद पिकाचा उपयोग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून एक दिवसाचे हळद लागवडीचे प्रशिक्षण घेऊन सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांना हळदीचे पिक घेण्याचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी यंदा या सुधारित जातीच्या हळदीची लागवड केली. भूमी कृषी धन शेतकरी सेवा संघ ह्या छताखाली येऊन शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सेलम जातीचा सदुपयोग करून यंदा हळद लागवडीचा प्रयोग केला. हळदीची लागवड केवळ सेंद्रिय खतावरच करायचे त्यांनी निश्चित केले.