मच्छीमारांचा विश्वासात घेऊनच जिंदल कंपनीने काम करणे गरजेचे आहे. मच्छीमारांचा डावललात तर उद्रेक होईल, असा इशारा देतानाच तत्काळ २० लोकांची समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. स्थानिक मच्छीमारांचा समस्या सोडविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली कार्यालयात झाली. रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीकडून नवीन जेटीचे काम मिरवणे येथे सुरू आहे.
त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नाहक त्रास दिला जात होते. त्याच्याविरोधात स्थानिकांनी एकत्र येत पालकमंत्री सामंत यांच्याकडे तक्रार केली. या वेळी मच्छीमारांनी पालकमंत्री यांच्यासमोर जिंदल कंपनीच्या समस्यांबाबत जिंदलचे समन्वयक एस. एम. पाटील आणि इतर अधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली. तत्काळ २० लोकांची समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी दिले. जिंदल कंपनीच्या ज्या अडचणी आहेत, त्या संदर्भात मच्छीमारांसमोर चर्चा करून कंपनी ते पूर्ण करून देणार असल्याचे सांगितले.
नौका ये-जा करण्याच्या चॅनेलमध्ये मच्छीमारी करण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत. जिंदल कंपनीने जर योग्य त्या परवानग्या घेतल्या नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी जिल्हाधिकारी सूर्यवंशी, प्रांत जीवन देसाई, जिंदलचे अधिकारीएस एम. पाटील, मच्छीमारांकडून बशीर वडेकर, मुशतक टेमकर, सुदेश मोरे, बाबू पाटील, महेश नाटेकर, विष्णू पवार, नंदू केदारी, अजीम चिकटे, शरद चव्हाण उपस्थित होते.