रत्नागिरी पालिकेला दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे १५ दिवस शीळ धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा यावर्षी कमी पर्जन्यमान झाले. परिणामी, शीळ धरणात कमी पाणीसाठा झाला असून, उष्ण तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणी पातळी घटत आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मॉन्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरवण्यासाठी पाणी कपात अनिवार्य होती. मॉन्सूनच्या आगमनापर्यंत शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी १ मार्च २०१४ पासून प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता.
यंदादेखील पाणी कपातीला सुरुवात झाली होती. त्यानुसार दर सोमवारी पाणी कपात सुरू झाली आणि एकूण पाणीसाठ्याचा विचार करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता; परंतु गेले दहा ते अकरा दिवस कोसळणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सतत कोसळणाऱ्या पावसाने आठ दिवसांमध्ये रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य शीळ धरण आता पूर्णक्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. रत्नागिरी शहरवासीयांसाठी ही एक समाधानाची बाब आहे. कारण आता नागरिकांना दरदिवशी मुबलक पाणी मिळणार आहे. पाणी टंचाई आणि पाणी कपातीपासून रत्नागिरीकरांची सुटका झाली आहे.
शीळ धरणाची क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर – शीळ धरणाची साठवण क्षमता ४. ३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्या महिन्यात हा पाणीसाठा निम्म्यावर आला होता. त्यामुळे शहरात दर सोमवारी पाणी कपात सुरू केली होती; परंतु पूर्वमोसमी पावसामुळे तीन दिवसांपूर्वी हा साठा ७१ टक्के होता, तर आज पावसामुळे शीळ धरण १०० टक्के भरून वाहू लागले आहे.