ख्रिसमस आणि नववर्षच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाकडे वळू लागले आहेत. स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य ठिकाण आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्याला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळाली आहे. शिवाय जवळचा मार्ग म्हणजे शिरगाव मार्गे आरे-वारे, काजीरभाटीमार्गे गणपतीपुळे या प्रवासाला रत्नागिरी शहरातून साधारण पाऊण तास लागतो; परंतु सध्या रस्त्यावर वाहने वाढल्याने पर्यटक धिम्या गतीने वाहने हाकत आहेत.
मोठ्या खासगी गाड्या येत असल्याने शिरगाव भागात वाहतूककोंडी होत आहे. पर्यायी मार्ग त्वरित काढण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर शिरगाव येथे बऱ्याचदा वाहने वाढली कि वाहतूककोंडी होते. या मार्गाला बायपास मार्ग अद्याप झालेला नाही. या रस्त्याचे गेल्या वर्षी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तरी देखील लागतच वस्ती असल्याने, रस्ता थोडा अरूंदच आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडीचा त्रास पर्यटकांसह नियमित येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नाताळ व नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी विविध समुद्र किनारी लाखो पर्यटक आले आहेत. आकर्षक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असणाऱ्या गणपतीपुळे येथेही गर्दीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ वाढली असून आज रत्नागिरी शहरानजीक शिरगाव येथे वाहतूककोंडीचा सामना पर्यटक व सामान्य नागरिकांना करावा लागला. बराच वेळ ही कोंडी झाल्याचे पर्यटकांनी सांगितले. अनेक वेळा मोठी वाहने असतील तर, दीड दोन तासांपेक्षा देखील अधिक काळ एकाच जागी थांबून रहावे लागते. त्यामुळे परिसरामध्ये देखील वातावरण बदलत जाते.