शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. पक्षाच्या या स्वबळाच्या भुमिकेमुळे महाविकास आघाडी फुटली अशा चर्चा आता सुरु झाली आहे. याबाबत आता काँग्रेसने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे म्हटले आहे. एकत्र लढण्यासाठी त्यांना विनंती करू. ते सोबत नाही आलें तर आमचा मार्ग मोकळा असेल. शरद पवार आणि आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे. आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करु, अशी भुमिका काँग्रेसने मांडली आहे. शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडीच्या पराभवावरून मित्र पक्षांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर शनिवारी संजय राऊत यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राऊत हे नेते मोठे आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली असेल. तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी म्हणालो की, नाना भाऊ, संजय राऊत आणि आम्ही त्या चर्चे त होतो. आम्ही चर्चेच्या गुऱ्हाळात २० दिवस घालवले. आम्हाला प्लानिंग करायला हवं होतं. प्लानिंग नसल्यामुळे आम्हाला फिरायला वेळ मिळाला नाही.. त्याचा अर्थ त्यामुळे आम्हाला झटका बसला, असं म्हटलं. पण माध्यमांनी चुकीचं दाखवलं. पराभवाला दोघंच जबाबदार आहे, अशी बातमी पेरली. ती चुकीची आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय असू शकतो. आमच्या पक्षाने मात्र अजून भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसची राज्यात ताकद आहे. काँग्रेस मजबुतीने लढू शकतो. त्यांनी काही निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं नाही.
आम्ही विधानसभेत एकत्र काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले असतील असं वाटत नाही. पण कोणी भूमिका घेतली असेल तर ती त्या पक्षाची भूमिका असू शकते, असंही त्यांनी म्हटलं. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे ही आमची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आमच्या पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोलू आणि आमचे श्रेष्ठी निर्णय घेतील. पण संजय राऊत यांनी या गोष्टी मीडियात बोलण्यापेक्षा चर्चेच्या माध्यामातून बोललं पाहिजे. त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत ते मांडतात. आमच्या पक्षाचं मत आम्ही तुम्हाला सांगू, असं वर्षा गायकवोड म्हणाल्या.
दरम्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका आणि महाविकास आघाडीवर त्याचा होणारा परिणाम याबाबत भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना मुंबई, पुणे ते नागपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी फुटली अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, भंडाऱ्यात त्यांना मविआबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढल्यास त्याचा मविआवर परिणाम होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.