शिवसेनेने रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटामध्ये हजेरी लावल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळे अनेक जेष्ठ शिवसैनिक देखील त्यांच्यावर नाराज झाले आहेत. सामंतानी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या रत्नागिरीमधील समर्थकांवर सुद्धा गदा आली आहे.
सामंतांच्या समर्थकांचीही पक्षातून बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून सुद्धा मी शिवसेनेतच आहे असे म्हणणाऱ्या आमदार सामंत यांना सेनेने चांगलाच झटका दिला आहे. शिवसेनेने आता एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाईचा धडका लावला असून, सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची देखील उचलबांगडी करण्यात आली होती.
त्यानंतर आता शिवसेनेने आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांचीही पक्षातून उचलबांगडी केली आहे. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
सामंत यांनी शिवसेना विरोधात बंडखोरी केल्यानंतर सुद्धा मी शिवसेनेत आहे आणि शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याचे सांगत आहेत. आमदार सामंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर खासदार विनायक राऊत त्यांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आम. सामंत यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेवून त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्याचे सांगितले. त्यात आता पक्षानेही आम. सामंत समर्थकांचे पद काढून घेण्यात आले आहे. यातून सामंत हे शिवसेनेत नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे.