विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा फुगा फुटला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची कोणती रणनीती आखली आहे, याची आम्हाला माहिती नाही. त्यांनी आतापर्यंत मुंबई महापालिकेतून मलई मिळवली. या निवडणुकीत त्यांना पायउतार व्हावे लागले तर त्यांचा पक्ष संपणार आहे, असे मत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते आज रत्नागिरीत आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता ३६५ दिवस जनतेच्या कामासाठी कार्यरत असतो. आमचे मित्रपक्षही अशाच प्रकारे काम करत आहेत. आमची रणनीती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून वर्षभर सुरू असते.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती विजयी होईल. त्या त्या ठिकाणच्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा निर्णय आमचे महायुतीतील पक्षांचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही लोक राजकीय स्टंट करत आहेत. कोणत्या परिवाराने एकत्र यावे, बाजूला व्हावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. देवाभाऊ हे १३ कोटी महाराष्ट्रवासियांच्या हृदयातील नेते आहेत. त्यामुळे ते पालक या नात्याने सर्वांच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. ते जनतेचे नेते आहेत.
राष्ट्रवादीबाबत ठोस माहिती नाही – शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीबाबत अशी कोणतीही बातमी नाही, त्यामुळे ठोस माहिती मिळाल्याशिवाय चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.
प्रभागरचना फायदेशीर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. प्रभागात ४ नगरसेवक असल्यास जनतेची कामे करण्यासाठी हे नगरसेवक सक्रिय राहतात. प्रभाग मोठा तेवढे नगरसेवक असावेत. ही प्रभागरचना जनतेसाठी फायदेशीर असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.