अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर लँडिंगचा अँगल चुकणे आणि मानवी चूक हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले तांत्रिक बिघाडासोबतच हवामान आणि पायलटच्या निर्णयामुळे अपघात घडला अंतिम अहवालानंतर अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. २८ जानेवारीला बारामतीत अजित पवार यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला? याचा तपास केला जात आहे. अशातच या घटनेच्या ९ दिवसानंतर या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये अपघाताबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ‘अजितदादांचा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर लँडिंगचा अँगलच चुकला’ अशी धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानाला झालेला अपघात हा फक्त तांत्रिक बिघाडामुळे झालेला नाही. या अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत होत्या, असे निरीक्षण प्राथमिक चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
विमान लँडिंगच्या वेळी पायलटला धावपट्टीच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडला असल्याचा खुलासा या अहवालात करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक निरीक्षणांनुसार, विमान उतरण्याच्या क्षणी त्याच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा. त्यामुळेच पायलटचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान लैंडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकला, असं या चौकशी अहवालात म्हटलं आहे. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचण आली होती. यामुळे विमान भरकटले. धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली ही चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली असल्याचे देखील या चौकशी अहवालाद स्पष्ट करण्यात आले आहे. हा प्राथमिक अहवाल आहे. पण याबाबतची सखोल चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं हे स्पष्ट होईल.

