सिंधुदुर्गमधील सावंतवाडी उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा पडदा अखेर उठला असून, बेपत्ता झालेला “त्या” तरूणानेच हे दोन्ही खून केल्याची कबूली जबाबात मान्य केले आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी हे हत्याकांड घडले असून पोलीसांनी आरोपीला शिताफीने जेरबंद केले आहे.
कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी असे गुन्हेगाराचे नाव असून शहरातून अचानक कोणालाही काही खबर न देता, सांगता हा दोन वेळा बेपत्ता झालेला होता. त्यामुळे अशाप्रकारे बेपत्ता झाल्याने पोलिसांची करडी नजर त्यावरच बसली. याबाबतची सखोल माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी दिली आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन वृद्ध महिलांची गळा चिरून निर्घूण हत्या करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा तपास कामाला लागली होती. खून प्रकरणामध्ये सहभागी असल्यानेच त्याने भितीपोटी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण विष प्यायल्यानंतर त्याने बायकोला तसे फोन करून सांगितल्यावर तिने लगेच पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला आणि वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. तेंव्हापासून पोलीस त्याच्यावर पळत ठेवूनच होते. त्याने अनेक वेळा पळून जाण्याचाही प्रयत्न केला.
सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात नाट्यमय रित्या गायब झालेला तरुण अखेर पोलिसांना मुंबई ठाणे येथे सापडला. बेपत्ता असला तरी, फोन सुरु असल्याने ट्रेसिंगमुले त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळणे शक्य झाले. ठाण्यातून आरोपीला सावंतवाडीत आणल्यानंतर त्याची येथील पोलिस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याने केलेल्या खुनाच्या कृत्याची कबुली दिली.
कुशल हा मृत नीलिमा खानविलकर यांचा शेजारी असून तो कर्जबाजारी असल्याने, पैशांची गरज भासल्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते.