गेल्या काही वर्षांत घाटरस्त्यांमध्ये अति वृष्टीमुळे रस्ता खचण्यासारखे गंभीर प्रकार वाढले आहेत. बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत आहेत. घाट रस्त्यांच्या डोंगराकडील बाजूने वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. हे माहिती असून देखील पाण्याच्या निचऱ्यावर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गटारातील सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यातूनच रस्ता खचण्याच्या प्रकियेला सुरुवात होते.
आतापर्यंत करुळ, भुईबावडा, फोंडा या तीनही घाटांमध्ये रस्ते खचण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यांतील साईड गटारींची साफसफाई करणे गरजेचे असले तरी, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने हे रस्ते खचण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातच एखाद्या ठिकाणी रस्त्याला छोटे भगदाड पडलेले असताना त्याचे बांधकाम करण्याऐवजी ते लहान आहे म्हणून दुर्लक्ष केले जाते, परंतू, तेच मोठे होऊन कालांतराने डोकेदुखी ठरते.
खचलेल्या रस्त्यांचे कमी खर्चामध्ये गॅबियन पद्धतीने बांधकाम करता येते. पंधरा वर्षांपूर्वी या पद्धतीचा वापर करुळ घाटात करण्यात आला होता. लोखंडी जाळीमध्ये दगड रचून बांधकाम केले जाते. पाण्याचा निचरा आणि दुसरीकडे रस्ता टिकवून ठेवण्याची क्षमता या बांधकाम पद्धतीमध्ये होती. बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मलमपट्टीच्या उपाययोजना यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील चारही घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोणत्याही क्षणी घाटरस्ते बंद पडतील, अशी दयनीय परिस्थिती असून, या पावसाळ्यात देखील घाटमार्गांवरील वाहतूक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरणार आहे.
भविष्यामध्ये या प्रकारच्या पद्धतीने बांधकाम करण्याचे बांधकाम विभागाने जाहीर देखील केले होते; परंतु त्या पद्धतीचा आता विसर पडला आहे. करुळ आणि भुईबावडा हे घाटरस्ते एकमेकाला उत्तम पर्याय आहेत. करुळ घाट रस्त्याच्या डागडुजीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो; मात्र त्या तुलनेत भुईबावडा घाट रस्त्यावर खर्च केला जात नाही. परिणामी या घाट रस्त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

