अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत त्यांनी हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
मुलाच्या वर्धा येथील असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला होता. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बालसदन या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांचा सांभाळ करत असत. या संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि व्यवसायपर प्रशिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे कशी उभी राहतील, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असायचे. सिंधूताई सपकाळ यांनी जीवनभार केवळ अनाथ व बेवारस मुलांना आधार देऊन त्यांना यशस्वी घडविण्याचे फार मोठे काम केले.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती खरीखुरी मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.” असं म्हणत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त करत आदरांजली वाहिली.
त्याचप्रमाणे, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.