25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunचिपळुणात पुराचे पाणी भरल्यास सायरन वाजणार - नगरपालिका सज्ज

चिपळुणात पुराचे पाणी भरल्यास सायरन वाजणार – नगरपालिका सज्ज

पावसाळ्यात महापूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास धोक्याचा इशारा देणारी सायरन सिस्टिमची यशस्वी चाचणी आज घेण्यात आली. पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान मानले. शहरात पाणी भरत असल्याचे लक्षात आल्यावर पालिका सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट करणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले, चिपळूण शहराने दोन महापुरांचा अनुभव घेतला आहे. या अनुभवातून शिकताना वाशिष्ठी नदी गाळमुक्त करणे हे अभियान शासनाने सुरू केले आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाशिष्ठीतील गाळ काढल्याचा परिणाम मागील वर्षी दिसून आला; मात्र गेल्या वर्षी पाणी भरले नाही म्हणून यावर्षी भरणार नाही असे नाही. पालिकेला अलर्ट राहावे लागणार आहे.  शहरात नदीलगतच्या भागात प्रथम पाणी भरते त्यानंतर हळूहळू संपूर्ण शहर जलमय होते. शहरात पाणी भरण्यास सुरवात झाली की, पालिकेचा भोंगा वाजतो.

पालिकेने शहरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी १० ठिकाणी आपली यंत्रणा बसवली आहे. ती यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची आज चाचणी घेण्यात आली. पालिकेने आपत्तीला सामोरे जाताना सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. बोटी सज्ज आहेत. काही बोटी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. पालिका कर्मचारी आणि शहरात पोहणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पूरपरिस्थितीच्या काळात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येईल याचे प्रशिक्षण आम्ही कर्मचाऱ्यांना दिले आहे. वाशिष्ठी नदीमध्ये काही प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. पूरपरिस्थितीच्या काळात आवश्यक असणारी यंत्रणा आम्ही उपलब्ध केली आहे. पालिकेत २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष चालू राहणार आहे. लोकांना तेथे संपर्क साधता यावा यासाठी मोबाईल सेवेची व्यवस्था केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular