ग्रामीण भागातून हल्ली अशा प्रकारच्या गुप्त चोऱ्या आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी व्हेल माशाची कोट्यावधी रुपयांची उलटी विकण्यासाठी जाणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली होती. आणि आता हे प्रकरण समोर आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील तीन जणांना बिबटयाची कातडी तस्करी केल्याप्रकरणी राजापूर वन विभागाने ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री ९.३० वाजता मुंबई-गोवा हायवेवरील कोदवली पेट्रोलपंप येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मंगल एजन्सीचे इंडियन ऑईल या पेट्रोल पंपवरती दोन दुचाकी स्वारांची हालचाल संशयास्पद वाटल्याने परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी व वनविभागाचा स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपींची चौकशी करुन त्यांच्या कडील असलेल्या बॅगची तपासणी केली असता एका बॅगेमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याची कातडी आढळून आली.
या तस्करी प्रकरणी सर्व वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे राहणारे असून, त्यांची नावे जयेश परब, दर्शन गडेकर, दत्तप्रसाद नाईक आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडील असलेल्या सर्व मुद्देमालासह दोन मोटरसायकली आणि महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१, ५२ संरक्षण कायदयान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
राजापूर वन विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी या तीनही संशयीत आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता आरोपीना २४ सप्टेंबर पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.