राजापूर तालुक्यात बारसू येथे रिफायनरी होणार की नाही याबाबत उलटसुलट अंदाज वर्तविले जात असतानाच आता या प्रकल्पासाठी कोयनेचे अवजल पुरविण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दररोज ३०० एमएलटी पाण्याची या प्रकल्पाला गरज राहणार आहे. वाशिष्ठी नदीतून हे पाणी उचलण्यात येणार असून याबाबतचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. आठवडाभरातच तो एमआयडीसीकडे सोपविण्यात येणार आहे. जिओ इन्फो या संस्थेकडे हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. वाशिष्ठी ते बारसू या सुमारे १४० कि.मी. मार्गामध्ये त्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
बारसू रिफायनरीसाठी दररोज ३०० एमएलटी पाण्याची गरज राहणार आहे. तितके पाणी पुरविण्याची क्षमता वाशिष्ठी नदीची आहे आणि त्याचबरोबर या मार्गावरील चिपळूण-संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील सुमारे १०० गावांनाही या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. जिओ इन्फो करत असलेल्या या आराखड्यात तीन मार्गांवरून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन प्रस्तावित आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग आणि अन्य एका मार्गाचा समावेश आहे.
जिओ इन्फोचे राहुल देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता हा आराखडा अंतिम टप्प्यात असून ८ ते १० दिवसांत प्राथमिक स्वरुपाचा आराखडा एमआयडीसीकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रोजगारासोबतच जनसुविधा देण्याचा विचार करून शासनाने बारसू रिफायनरी उभारण्याबाबत निर्णय घेतल्याचे आता दिसून येत आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यासाठी प्रयत्नशील आहेत.