मागील ४ महिन्यांपासून सुरु असलेला एसटी महामंडळाच्या संप कारणाने, दिवसेंदिवस होणारे नुकसान लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक आणि आर्थिक उत्पन्न पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ते पुन्हा सुरु होऊन एसटी सेवा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या द्वारे चालकांची भरती करण्यासाठी आणि त्यांच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ामध्ये निविदा काढण्यात येणार आहेत आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे.
एवढा काळ उलटून गेला तरी संप संपुष्टात येण्याचे नाव दिसत नसल्याने एसटीत यापूर्वी पहिल्या टप्प्यात १,७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. आता आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येणार आहे. वाहकही मोठय़ा संख्येने संपात सामील आहेत. त्यामुळे केवळ चालकांचीच भरती केली जात आहे मग वाहकांची भरती का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
सध्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर उपस्थित आहेत. उरलेले इतके कर्मचारी आपल्या विलगीकरणाच्या मागणीवर आणि संपावर ठाम राहिल्याने एसटीचे चार महिन्यांपासून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अखेर चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे सांभाळणाऱ्या व्यक्तींची भरती करण्यात येणार आहे. हि भरती जरी कंत्राटी पद्धतीची असली तरी, त्यामुळे पूर्णपणे थांबलेले एसटीचे उत्पन्न पुन्हा सुरु तरी होईल.