एसटीचे शासनातील विलनीकरणा विरोधात मागील आठवडाभर संप सुरूच आहे. शुक्रवारी राजापूर आगारातून दिवसभरात दोन फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या, मात्र जिल्ह्यातील उर्वरित सर्वच्या सर्व फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला राजापूरमधील मान्यताप्राप्त रिक्षा संघटनांनी देखील पाठींबा जाहीर केला आहे.
अखंड महाराष्ट्रभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग आठवडाभर तीव्रतेने सुरुच राहिल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. संपात उतरलेल्या जिल्ह्यातील एकूण २७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर, नोकरी जाण्याच्या भीतीने संपातून कर्मचारी माघार घेतील अशी आशा होती, मात्र शुक्रवारी राजापूर मधून हातदे आणि बुरंबेवाडीला सोडण्यात आलेल्या दोन फेऱ्या व्यतिरिक्त जिल्हातून एकही गाडीची फेरी रस्त्यावरुन धावलेली नाही. कर्मचारी एकजुटीपुढे आता प्रशासनही हतबल झालेले दिसून येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत शिष्टमंडळ आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये विलिनीकरणाची मागणी आग्रही धरण्यात आली होती असे मंत्री अनिल परब यांनी सांगितले. परंतु त्यावर परबांनी स्पष्ट केले कि, विलिनीकरणाची मागणी आम्ही एकटे मान्य करु शकत नाही. परंतु हा निर्णय हायकोर्टाच्या अन्वये उच्च स्तरिय समितीच्या समोर आहे. त्या समितीला १२ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल जेंव्हा येईल, तो आल्यावरच निर्णय घेण्यात येईल. यावर शिष्टमंडळाने हा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी केलेली.
त्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे कि, समितीची निर्णय सकारात्मक आल्यास एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात येईल असे तसेच जे कर्मचारी निलंबित झाले आहेत. त्यांच्या बाबत सुद्धा संप मागे घेतल्यावर चर्चा करण्यात येईल असेही परब यांनी म्हटलं आहे.