परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोना काळामध्ये आधीपासूनच एसटी बंद होत्या. प्रभाव कमी झाल्यावर शाळा, कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, असं परब म्हणाले.
मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करतोय. समिती या बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असं ते म्हणाले. पगार वाढीमुळे अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत. मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो, आपली एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. आंदोलनामुळे आज राज्याचे मोठे नुकसान होत आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील तर कडक कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई झाली, त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एवढा आडमुठेपणा जर कर्मचारी करणार असतील तर , जनतेचा सुद्धा विचार लक्षात घेऊन, व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावीच लागणार आहे. चार ते पाच वेळा संधी देऊन सुद्धा जर कर्मचारी हजर होत नसतील तर, आम्हाला सुद्धा वेगळ विचार करणे भाग आहे. असंही ते म्हणाले.