गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला काही प्रमाणात अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. इतक्या वर्षामध्ये एवढी पगारवाढ कधी झालीच नव्हती. तशी जाहीर घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली होती.
ठाकरे सरकारनं पगारवाढ जाहीर करूनही अनेक एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पगारवाढीच गाजर दाखवून शासन आमच्यात फुट पाडायचा प्रयत्न करत आहे असे संपकर्यांचे म्हणणे आहे. विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
सांगली येथे आयोजित केलेल्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले, जिथे मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला केवळ १२ हजार पगार मिळतो हे कितपत योग्य आहे! असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार पगार मिळतो. पण जो एसटी चालक स्वत:च्या जबाबदारीवर हजारो लोकांना घेऊन सुखरूप प्रवास घडवतो, त्याला फक्त १२ हजार पगार मिळत असेल तर ते पूर्णत: चुकीचं आहे. आम्ही कायम त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही.
आंदोलन मागे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर फक्त ८ तास वीज मिळत असेल आणि पूर्ण बिलाची वसूली केली जात असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. सरकारने नक्की त्यावर विचार करावा, असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.