खासगी गाड्यांशी वाढत्या स्पर्धेमध्ये सर्वसामान्यांची एसटी नफ्यामध्ये येऊन कार्यरत राहावी, सर्वसामान्यांना चांगली सेवा घेता यावी या उद्देशाने शासनाकडून विविध अभिनव उपक्रम राबवून प्रयत्न केले जात आहेत; मात्र, एसटीच्या सेवेत काम करणारे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे एसटीच्या सेवेचा बोजवारा उडत आहे. राजापूर आगारातून पुणेसह अन्य काही लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या गाड्या रस्त्यातच बंद पडत आहेत. प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. राजापूर आगारातून गेल्या शुक्रवारी (ता. ४) सकाळी ८.४५ वा. सुटलेली राजापूर पाचल- अणुस्कुरामार्गे पुणे गाडी कळे स्टॉपपासूनच क्लचप्लेटचे काम निघाल्याने बंद पडू लागली.
कशीबशी ही बस त्या चालक-वाहकांनी कोल्हापूर. आगारात नेली. मात्र, तेथे बस दुरुस्तीसाठी विलंब लागणार असल्याने या गाडीतून थेट पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या गाडीत बसवून देण्यात आले. या वेळी अनेक वृद्ध व महिला प्रवाशांना आपले सामान नेताना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी चालक व वाहकांनी मोलाची मदत प्रवाशांना केली. गेल्या रविवारी पुण्याकडून राजापूरकडे सकाळी ९ वा. स्वारगेटवरून सुटलेल्या गाडीची अवस्थाही तशीच झाली.
ही गाडी पुणे-कोल्हापूर मार्गावर बंद पडली. अखेर कोल्हापुरातून तांत्रिक कर्मचारी आले, त्यांनी गाडी दुरुस्त केली आणि मग ती गाडी पुढे मार्गस्थ झाली. सायंकाळी ७ वा.पर्यंत राजापुरात येणारी ही गाडी रात्री ९.३० वा. राजापुरात पोहचली. या वेळीही प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अशीच काहीशी स्थिती काहीवेळा बोरिवली, मुंबई, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांची असते.