रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अवैध व्यवसायांविरुद्ध एकूण १ हजार १८० गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ९६४ संशयितांना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये हातभट्टीची गावठी दारू २५ हजार ९३५ लिटर, देशी मद्य ४८४.५६ बॅरेल. लिटर, महाराष्ट्रात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ३३६.५६ बॅरेल. लिटर, बिअर ८३.८५ लिटर, गोवा राज्यात निर्मित ३१५०.१५ व. लिटर, रसायन २६०७५० लिटर, प्लास्टिकचे बॅरेल व कॅन, काचेचे ग्लास तसेच अवैध मद्याची अवैध वाहतूक करणारी एकूण ६ वाहने, असा एकूण १ कोटी ६३ लाख ३४ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
होळी, शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरून प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून सुरू आहे. गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे.
पथकांना दिलेल्या सूचना – मद्याची अवैध वाहतूक रोखणे. रात्रीची गस्त अधिक करडी करणे. संशयित वाहनांची तपासणी करा. अवैध दारू व्यवसायांना प्रतिबंध.
चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे – एप्रिल २०२४ पासून अद्यापपर्यंत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे ६१ प्रस्ताव जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत. त्यापैकी ३३ प्रकरणांत रुपये २१ लाख ५० हजार एवढ्या रकमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारूधंद्यात गुंतलेल्या संशयितांकडून घेण्यात आली आहेत.