राज्यामध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने काही महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पहिली ते आठवी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ही परीक्षा रविवार २० फेब्रुवारीला नियोजित होती. त्याचबरोबर या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी आता ३१ जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण परिषदेकडून २० फेब्रुवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून या परीक्षांची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा आणि सुरक्षितेला प्राधान्य देत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून अनेक प्रकारच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.१०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आलेल्या. केवळ शालेय अंतर्गत गुणांकनावरून विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात आला. पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनापासून बचाव करताना मागील दोन वर्ष खूपच त्रासदायक गेलीत. आणि तिसऱ्या लाटेचा जास्त प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याने भाकीत केले असल्याने शासन आणि पालकवर्ग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खटपट करताना दिसत आहेत. त्यामुळे मागील वर्षीसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे.