कर्नाटकच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पुढील २ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीला यलो अलर्ट देण्यात आला असून मच्छिमारांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या नौका किनाऱ्यावर आणल्या आहेत. कर्नाटकच्या समुद्रात एक चक्रीवादळ घोंघावत. असून त्याचा परिणाम नजीकच्या कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी याच कमी दाबाच्या पट्टयामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले.
२ दिवस पावसाचे – आता पुन्हा एकदा कोकणात, आणि विशेषतः रत्नागिरी जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. २९ आणि ३० मार्च रोजी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरीला यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
मच्छिमार परतले – दरम्यान या पार्श्वभूमीवर मच्छिम ारांनी किनाऱ्यावर येणे पसंत केले आहे. अनेक मासेमारी नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या असून समुद्रातील वातावरण सुधारण्याची ते वाट पाहत आहेत. खराब हवामानामुळे यावर्षी मासेमारीला अनेक वेळा ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. आत्ताही तेच दिसते आहे. संपूर्ण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा असून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड, नाटे, हर्णे, मिरकरवाडा आदी प्रमुख बंदरांवर नौका विसावल्या आहेत.
आंबा उत्पादक धास्तावले – मुसळधार पावसाच्या शक्यतेने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. अजूनही अनेक झाडांवर फळ आकार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही प्रमाणात तयार झालेला हापूस मार्केटला पाठविण्याची लगबग सुरू आहे. यंदा आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.