कोकणातील सहा पिकांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जीआयचे वापरकर्ते वाढवले पाहिजेत. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्मार्ट योजनेचा, प्रधानमंत्री फळप्रक्रिया योजना, सेंद्रिय शेती योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. या योजनांमधून अनुदान मिळते. त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, असे प्रतिपादन कोकण विभागाचे स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख अंकुश माने यांनी रत्नागिरीत केले. रत्नागिरीत कृषी विभागामार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्टअंतर्गत विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी माने म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी कार्यशाळेचा उपयोग होणार आहे. जागतिक बँकेच्या साह्याने स्मार्ट, नैसर्गिक शेती अभियान राबवण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. नैसर्गिक शेती अभियानांतर्गत योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून कोकणातील ५५ कृषी कंपन्यांना ६६ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये भागभांडवलासह अन्य सर्व बाबींचा समावेश आहे.
आंबा, काजू, भात उत्पादने सेंद्रिय पद्धतीने करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे तसेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात अधिक मागणी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले पाहिजे. या कार्यक्रमात कोकण विभागाचे नोडल अधिकारी भीमाशंकर पाटील, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आत्माचे प्रकल्प संचालक पांगरे, मुकुंद खांडेकर, मंगेश कुलकर्णी, सुनंदा कुऱ्हाडे आदींनी मार्गदर्शन केले.