सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल पळस्पे ते कातळी भोगावच्या भुयारी मार्गापर्यंत दौरा केला. त्यावेळी रिलायन्स इन्फ्राचे पोटठेकेदार एसडीपीएल कंपनीला त्यांनी भुयारी मार्गातील विद्युतपुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर महावितरणकडे ठेकेदाराकडून पाठपुरावा केला गेला. परिणामी, दोन्ही भुयारांतर्गत विद्युत प्रकाशझोत आणि वायूविजनसाठीचे १० हवा बाहेर टाकणारे पंखे रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी वीजपुरवठा करण्यात येऊ लागला. कोकणाकडे जाणारा नवीन भुयारी मार्ग संपल्यानंतर खेड बाजूला कोकणात जाणारा भुयारी मार्गाचा अॅप्रोच रोड नादुरुस्त झाल्याने भुयारातून बाहेर आल्यानंतर शंभर मीटर अंतरापूर्वीच मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या जवळच्या रस्त्याला जोडण्यात आल्याने रात्रीच्यावेळी दोन्हीकडे जाणारी वाहने समोरासमोर येऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड बाजूला अॅप्रोच रोडच्या दुतर्फा उभारलेले पथदीप वीजपुरवठ्याअभावी सुरू झाले नसल्याने अपघाताच्या धोक्याची तीव्रता वाढली आहे. सद्यःस्थितीत वीजपुरवठा सुरू झाल्याने दिवसाही लख्ख प्रकाशझोतामध्ये भुयारी मार्गातून वाहने मार्गस्त होत आहेत.
२०० पथदीपांची उभारणी – कशेडी घाटाचा पर्यायी भुयारी मार्ग हा १.८ कि.मी. लांबीचा असून, भुयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. त्यामुळे ४५ ते ५० मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या १२ ते १५ मिनिटांत रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. दोन्ही भुयारांमध्ये वरील बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी केली आहे.
गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरूच – दोन्ही भुयारी मार्गातील अंतर्गत गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरीही आतापर्यंत गळती रोखण्यासाठी ग्राउंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन ६० टक्केच झाला आहे. त्या अंतर्गत पाणीगळती थांबवण्यात यश आले आहे. उर्वरित गळती कशी थांबवायची, याबाबतचे प्रयत्न तज्ज्ञ मार्गदर्शन (एक्स्पर्ट गाईडन्स) घेऊन थांबवण्यात यश येईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.