दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून, त्याचा परिणाम मनुष्यासह सर्वच प्राण्यांवर होत आहे. विहिरी, नद्या कोरड्या पडल्यामुळे वाड्यावस्त्यांवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे जंगलातील मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. भुकेपोटी किंवा पाण्याविना मुक्या प्राण्यांची परवड होत आहे. या मुक्या प्राण्यांची तहान भागावी यासाठी खेड वनविभागाने सात्विणगाव येथील वनपरिक्षेत्रात दोन पाणवठे तयार केले आहेत. ही संकल्पना खेड येथील वनपाल सुरेश उपरे यांनी मांडली होती. खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वनविभागाचे ११४ हेक्टरवर शासकीय वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये बिबटे, भेकर, नीलगाय, मोर, रानडुक्कर, ससा, साळिंदर, कोल्हे, काळमांजर यांसह अन्य वन्यप्राणी तसेच विविध सरपटणारे प्राणी, विविध पक्षी आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची जवळपास कोठेही सोय नाही. जंगलात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरच हे प्राणी अवलंबून असतात.
काहीवेळा हे प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी जवळील वहाळापर्यंत येतात. यंदा उन्हाचा कडाका वाढला असून, भूगर्भातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. वहाळ, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. अजून दीड महिना उन्हाचा रखरखाट राहणार आहे. सात्विणगाव येथील वनविभागाने जंगलात श्रमदानातून पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांची होणारी वणवण थांबणार आहे. यासाठी वनरक्षक अशोक ढाकणे, रानबा बंबर्गेकर, परमेश्वर डोईफोडे, वैभव काटेखाये, प्रियांका कदम यांनी हे दोन पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्याची पाणी साठवण क्षमता सुमारे ६०० लिटर आहे. पाणवठ्यामधील पाणी संपत आल्यावर आवश्यकतेनुसार तिथे टँकरने स्वच्छ पाणी वेळोवेळी भरले जाणार आहे. येथील जंगलभागात वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या जंगलातील प्राणी तिथे वास्तव्य करणार आहेत. या उपक्रमाबद्दल विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी नुकतीच पाणवठ्यांची पाहणी केली आणि खेडच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.