महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संबंधित असलेल्या कारखाना संचालकांच्या घरी आणि नातेवाईक, बहिणी तसेच पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून गेले दोन दिवस छापेमारी करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन आयकर विभागाची टीम हि छापेमारीची कारवाई करत आहे.
गुरुवारपासून सुरु असलेली कारवाई शुक्रवारी सुद्धा सुरुच ठेवण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. “दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्र हा दिल्ली काय कोणा समोर देखील झुकणार नाही असे परखड वक्तव्य राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच संघर्ष करणे हि पवारांची खासियत असल्याचे सुप्रिया सुळेंनी विशेष उल्लेख केला आहे.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी तसेच त्यांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाच्या वतीने दुसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरू ठेवण्यात आलीआहे. पाहुणे वेगवेगळ्या घरी आहेत. त्यांचे काम सुरू आहे. त्यांचे काम पूर्ण झाल्यावरच काय द्यायची ती मी प्रतिक्रिया देईन. आयकर विभागाच्या वतीने अजूनही चौकशी सुरू आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. सरकारी नियमाने जे काही असेल ते जनतेच्या समोर येईलच, त्यात घाबरायचं काहीही कारण नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा यावर आपले मत व्यक्त केले आहे कि, अजित पवारांच्या घरी सरकारी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात नाही. हे केवळ सुडबुद्धीने सुरु असेलेल राजकारण असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.